१८ जानेवारी रोजी स्वतंत्र भारत पक्षाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन..

प्रतिनिधी– कार्यकारी संपादक -मुनीर सय्यद

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, वीज प्रश्न, पीक विमा, वन्य प्रान्यांपासून होणारे पिकांचे नुकसान व आयात – निर्यात धोरण या विषयांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाचे नेतृत्वाखाली, दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष मंडळाचा महाराष्ट्र दौरा २२ नोव्हेंबर पासून सुरू होऊन ३० डिसेंबर २०२३ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे दौऱ्याचा समारोप करण्यात आला. श्रीरामपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अनिल घनवट यांनी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली. पत्रकार परिषदेत घनवट यांच्या समवेत स्वतंत्र भारत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सीमा नरोडे उपस्थित होत्या.
शेतीमाल व्यापारातील सरकारच्या अतिरेकी हस्तक्षेपामुळे शेतमालाचे भाव पडतात परिणामी शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. आज देशात गहू, तांदूळ, तेलबिया, कडधान्य, साखर, कांदा आदी पिकांवर निर्यातबंदी, साठ्यांवर मर्यादा सारखे निर्बंध आहेत तसेच मोठ्या प्रमाणात आयती करून भाव पाडले जात आहेत. शेतकरी या अनैतिक कर्जत बुडाला आहे. शेतीसाठी मर्यादेत वेळेत वीज पुरवठा होतो, तो ही रात्री व अपुऱ्या दाबाने केला जातो. वीजबिल वसुलीसाठी पूर्ण गावाचा वीज पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांना पीक विम्याची गाजर दाखवून कंपन्यांचे गल्ले भरले जात आहेत. वन्यप्राणी शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान करतात त्या बद्दल शासन काही नुकसान भरपाई देत नाही मात्र एखादा प्राणी जर मारला गेला तर शेतकऱ्याला तुरुंगात डांबले जाते. शेतकऱ्यांच्या या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी, स्वतंत्र भारत पक्षाचे नेतृत्वाखाली एक दिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती देण्यात आली.
देशातील शेती प्रश्ना बरोबरच बेरोजगारी, गुन्हेगारी, कायदा सुव्यवस्था, महिला सुरक्षा, भ्रष्टाचार, महागाई व अवास्तव कर आकारणी सारखे प्रश्न सोडवायचे असतील तर स्वतंत्र भारत पक्षाने पुरस्कृत केलेल्या खुल्या व्यवस्था शिवाय पर्याय नाही असे मत सीमा नरोडे यांनी व्यक्त केले.
स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हा बैठकीत अहमदनगर जिल्हा स्व भा पक्षाच्या अध्यक्ष पदावर निलेश शेडगे यांची नियुक्ती करण्यात आली. बैठकीला नगर जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मधुकर शिंदे, ऍड. रावसाहेब करपे, कारभारी कणसे, बापूसाहेब आढाव, डॉ. संजय कुलकर्णी, बाळासाहेब सातव, इंदुबाई ओहोळ, संजय करपे, रावसाहेब निमसे, ज्ञानदेव गुळवे,, प्रकश जाधव, मधुकर काकड, श्रीराम त्रिवेदी,बाळासाहेब घोगरे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!